अनेक योगायोग किंवा कल्पनेपलीकडच्या घटना जर काही तासातच घडल्या तर आपण म्हणतो हे सगळं फक्त चित्रपटातच घडू शकतं. एकाच दिवसात एकापेक्षा अनेक अनपेक्षित घटना घडल्या तर असं वाटतं कि आपण दिवास्वप्न पाहतोय, एवढी प्रस्तावना यासाठीच की माझ्या आयुष्यात असाच काहीसा स्वप्नवत वाटणारा दिवस येउन गेलाय.
मी इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते. २००२ च्या फेब्रुवारी मध्ये एका रोजी मी आणि माझ्या दोन मैत्रिणींनी ‘बासर’ (जिथे देवी सरस्वतीचं अतिशय प्रख्यात मंदिर आहे) या गावी जाण्याचं ठरवलं. कधी जायचं, कसं जायचं सगळं ठरवलं.
ठरल्याप्रमाणं आम्ही पहाटे ५.३० पर्यंत रेल्वेस्थानकावर पोचलो. तिथे पोचल्यावर कळलं कि काही कारणास्तव बासरला जाणारी रेल्वे रद्द करण्यात आली होती. इथपासून आमच्या नाट्यमय आणि उत्कंठावर्धक दिवसाची सुरुवात झाली. रेल्वे तर रद्द झाली होती आता कसं जायचं? मग शासनाच्या लाल गाडीने जायचं ठरवलं आणि आम्ही तिघी बस स्थानकावर पोचलो. चौकशीअंति असं कळलं की बासरच्या बसला अजून दोन तास अवकाश होता. दोन तास काय करायचं? त्या दिवशी महाशिवरात्री होती म्हणून आम्ही शिव मंदिरात जायचं ठरवलं.
शिवमंदिरातील वातावरण खूपच प्रसन्न होते. ओम नमः शिवाय चा गजर चालू होता, भक्तिभावाने अनेक लोक महादेवाचं दर्शन घेत होते. अशा भक्तिपूर्ण, उत्साही आणि अध्यात्मिक वातावरणात शिवस्तुती करत आम्ही आमचे दोन तास घालवले. महादेवाचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा ‘बासर’ प्रवास आरंभला. बसस्थानकात पोचलो आणि आमच्या प्रवासात अजून एक वळण आलं. बासरला जाणाऱ्या बस मध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बस रद्द करण्यात आली होती. दूसरी बस संध्याकाळी होती, म्हणजे आता मात्र बासर प्रवास रद्द करावा लागणार या विचाराने आम्ही तिघीही हिरमुसलो आणि जड पावलाने परत निघलो. इतक्यात काही लोकांनी आम्हाला थांबवलं, ते सगळे पण बासरला जाणार होते. त्यांनी एक प्रस्ताव मांडला तो असा की, सगळ्यांनी मिळुन एक खाजगी वाहन ठरवायचं आणि संध्याकाळ पर्यंत परत यायचं. आम्हाला तो प्रस्ताव आवडला आणि काही क्षणासाठी रखडलेला बासर प्रवास पुन्हा एकदा सुरु झाला. खूप हायसं वाटलं.
गाडी बासरच्या दिशेने भरधाव धावत होती. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे छान गार वारा लागत होता. सगळेच अनोळखी होते पण तरीही एक प्रकारचे सकारात्मक आणि आल्हाददायक वातावरण गाडीत निर्माण झालं होतं. अनेक गावं मागे टाकत आम्ही पुढे जात होतो, आणि अचानक गाडी नरसी गावाजवळ थांबली. रस्त्यावर खूप गर्दी वाटली, बरेच लोक रस्ता अडवून थांबले होते. उस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी रस्तारोको आंदोलन उभारलं होतं. कोणत्याच वाहनास ते पुढे जाऊ देत नव्हते. थोडी भीती वाटली, थोडी काळजीही वाटली काय करावे काही कळत नव्हते. पुढे जाता येत नव्हते, माघारी फिरण्यास मन तयार होत नव्हते. काय करावं या द्विधा मनस्थितीतच आम्ही जवळपास दोन तास तिथेच थांबलो. बऱ्याच विनवण्या करून त्या लोकांनी काही वाहनास पुढे जाण्याची परवानगी दिली, त्यात आमचीही गाडी होती. अनिश्चित काळासाठी थांबलेला आमचा प्रवास परत एकदा सुरु झाला.
परत एकदा आम्हा तिघींना देवी सरस्वतीच्या दर्शनाचे वेध लागले. लवकरच बासरला पोचणार या विचारात आमचे डोळे कधी मिटले कळलंच नाही. काही वेळानंतर आमची गाडी अचानक थांबली, आम्हाला वाटलं की बासर आलं म्हणून आनंदाने जागी होऊन पहिलं तर कळलं की गाडीचा एक चाक पंक्चर झाला होतं आणि अतिरिक्त चाकात हवाच नव्हती. अरे देवा! अजून एक समस्या दत्त म्हणून हजर झाली. पूर्ण दिवसभरात आमच्यासमोर एकच प्रश्न वारंवार उभा राहत होता ‘आता पुढे काय करायचं?’ चाक दुरुस्त करण्यासाठी ग्यारेज जवळपास नव्हतं म्हणून गाडीचा चालक ते चाक घेऊन जवळच्या गावात गेला. आता त्या चालकाची वाट पाहण्याखेरीज आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बराच वेळ गेला तरीही तो चालक परत आला नव्हता, दिवस मावळतीकडे झुकत होता. काय करावं काही सुचत नव्हतं. आमच्यासोबत असलेल्या काही लोकांनी सांगितलं की दुसऱ्या वाहनाने जवळच्या गावी (धर्माबाद) जा, तिथून बासर जवळ आहे तेंव्हा तिथे बासर साठी खूप गाड्या मिळतील. आम्हाला ते पटलं आणि आम्ही दुसऱ्या वाहनाने धर्माबादला पोचलो.
बसस्थानकात जाऊन बासरच्या गाडीची चौकशी केली असता कळलं की बासरला जाणारी शेवटची गाडी नुकतीच गेली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एकही गाडी नव्हती. आता मात्र उरलं सुरलं अवसानही गळून पडलं, डोकं सुन्न झालं होतं. आमच्यासमोर परत फिरण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता पण मन मानायलाच तयार नव्हतं, इतक्या अडचणीनंतरही एवढ्या जवळ येउन परत फिरायचं या विचारानं गलबलायला होत होतं. कसं बसं आम्ही एकमेकींना सावरलं आणि गाडी व्यतिरिक्त बासरला पोचण्यासाठी काही व्यवस्था होईल का हे शोधू लागलो.
एक खाजगी ऑटो रिक्शा बासरला यायला तयार झाला. बुडत्याला काडीचा आधार तसा आम्हाला त्या रिक्शाचा आधार वाटला. अर्ध्या तासानी आम्ही बासरला पोचलो. देवी सरस्वतीचं मंदिर समोर दिसत होतं आणि मनात विचार येत होते की शेवटी आम्ही जिंकलो, आमची जिद्द, आशा आणि इच्छा फळाला आली. नव्या जोमाने आणि उत्साहाने देवीच्या दर्शनासाठी आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश केला. तिथे प्रचंड गर्दी होती. असंख्य लोक देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. महाशिवरात्रीला बासरला खूप मोठी जत्रा असते, यादिवशी देवीचं दर्शन घेणं अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून एवढी गर्दी होती. त्या रांगेत उभा राहून दर्शनासाठी २-३ तास लागणार होते आणि संध्याकाळचे ७ वाजले होते. आमच्याकडे इतका वेळ नव्हता. म्हणून आम्ही पास च्या रांगेतून जायचा ठरवलं. आणि पुढच्या अवघ्या १० मिनिटात देवीच्या गाभाऱ्यात पोचलो.
समोर देवी सरस्वतीची मूर्ती पाहून सगळा थकवा, मरगळ नाहीशी झाली. आम्ही प्रसन्न मनाने आणि समर्पित वृत्तीने देवी समोर नतमस्तक झालो. इतक्या अडचणीनंतरही आम्ही पोचू शकलो म्हणून देवीचे आभार मानले, परतीचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी साकडं घातलं आणि देवीचा आशीर्वाद घेऊन माघारी फिरलो.
लवकर धर्माबादला परतण्यासाठी रिक्षावाल्याने कच्चा शेतातून जाणारा रस्ता निवडला होता. रात्रीचे ८-८.३० वाजले होते अंधार पडला होता, रिक्षात आम्ही तिघीच होतो आम्हाला खूप भीती वाटत होती. पण लवकरच आम्ही धर्माबादला पोचलो. बसस्थानकात गेल्यावर कळलं की परतीच्या प्रवासाच्या सगळ्या गाड्या गेल्या होत्या आणि दुसऱ्यादिवशी सकाळपर्यंत एकही गाडी नव्हती. आता मात्र आम्ही आत्यंतिक अगतिक झालो. काय करायचं काही सुचेना तेंव्हा एकाने सांगितलं की जवळच्या एका गावातून आमच्या गावी जाण्याऱ्या गाड्या रात्रभर चालू असतात. पण त्या गावी जाण्यासाठीही एकही वाहन नव्हतं. अगदी थकून आम्ही रस्त्यातच उभ्या होतो. तेवढ्यातच एक ट्रक समोर येउन थांबला. आणि आम्ही ठरवलं आता काहीही होवो या ट्रकनेच पुढच्या गावी जायचं, तसं आम्ही ट्रक चालकाला विचारलं तो आम्हाला न्यायला तयार झाला.
ट्रकमध्ये सगळे पुरुष होते त्यात रात्रीची वेळ त्यामुळे ट्रकने जाण्याचा आमचा निर्णय तसा धाडसीच होता. खूप भीती वाटत होती, एकेक क्षण एकेका वर्षासारखा वाटत होता. आम्ही एकमेकींना अगदी घट्ट पकडून बसलो होतो, जणू काही न बोलताही स्पर्शातून एकमेकींना दिलासा आणि शक्ती देत होतो. शेवटी आम्ही त्या गावी पोचलो, बसस्थानकावर आमच्या गावी जाणारी बस उभी होती. हुश्श! खूप हायसं वाटलं, अत्यंत खुशीत आणि समाधानात आम्ही गाडीत बसलो. गाडीने तासाभरात आम्हाला आमच्या गावी पोचवले. घरी पोचेपर्यंत रात्रीचे १२ वाजले होते. आणि घरी पोचल्यावर लक्षात आलं की दिवसभरात आम्ही काहीच खाल्लं नाही, एकानंतर एक अश्या काही घडामोडी घडल्या की भुकेची भावना बळावलीच नाही. अत्यंतिक नाट्यमय परीस्थितींनी आणि भावनिक चढ उतारांनी खूप मानसिक थकवा आणि सुखरूप घरी पोचल्याचं समाधान यामुळे खूप गाढ झोप लागली.
सकाळो उठल्यावर असं वाटलं की मी स्वप्न पहात होते पण ते खरच घडलं होतं आमच्यासोबत. देवी सरस्वतीने आमची परीक्षा घेतली आणि आम्ही त्यात विशेष श्रेणीने उत्तीर्ण झालो……………………।
आयुष्यभर आठवणीत राहणारा रोमांचकारी प्रवास,👌👌👌
LikeLiked by 1 person
Very nice
LikeLike
Thanks dear
LikeLike
रोमांचकारी आणि नाटकीय आसा प्रवास, छान लिखाण शब्दात वर्णन केले.
LikeLike
Keep it up dear
Friend लिस्ट मधे तू आहेस खुप गर्व वाटतो.
सुंदर लिखाण.
LikeLike
धन्यवाद
LikeLike
अतिशय सुंदर आणि उत्तम वाचायला मिळाले!
LikeLike
धन्यवाद
LikeLike
विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. उत्तम लेखनशैली. वाचताना सहप्रवासीच आहोत असेच वाटते. योग्य ठिकाणची चपखल छायाचित्रे उत्तम. पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.
LikeLike
खूप खूप धन्यवाद…
LikeLike
वाचून वाटत होते की आपण बासर ला निघालोय.. सुंदर वर्णन…
LikeLike
धन्यवाद
LikeLike
खूप छान…. आणि खरंच एक रोमांचकारी प्रवास केल्या सारखं वाटल
LikeLike
धन्यवाद
LikeLike
सुंदर, रोमांच आणि उत्सुकता वाढवणारी कथा. खूप छान लेखनशैली.छायाचित्रांमुळे अजून जिवंत झाली कथा. इच्छा तिथे मार्ग आणि भाव तिथे देव.
LikeLike
धन्यवाद
LikeLike